परळी वैजनाथ (प्रतिनिधी ) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख व माजी नगराध्यक्ष अभयकुमार उर्फ पप्पू अण्णा ठक्कर यांनी संतापाचा सूर लावत परळी शहर हादरवून सोडणाऱ्या रेल्वे स्थानकातील अत्याचार प्रकरणी थेट इशारा दिला आहे. “या नराधम आरोपीचे वकीलपत्र कोणत्याही वकिलाने घेऊ नये, अन्यथा त्याला लोकांचा रोष ओढवून घ्यावा लागेल,” असे अभयकुमार ठक्कर यांनी स्पष्ट केले.
दि. ३१ रोजी परळी रेल्वे स्थानकात घडलेल्या या अमानुष घटनेत पंढरपूर येथील केवळ सहा वर्षांच्या निरागस चिमुकलीवर स्टेशन परिसरातून उचलून नेऊन अघोरी पद्धतीने क्रुर लैंगिक अत्याचार करण्यात आले. बरकत नगरातील २७ वर्षीय आरोपीला पोलिसांनी अटक केली असून अंबाजोगाई येथील विशेष न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
ठक्कर म्हणाले की, “या हैवानी कृत्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. उद्या (दि.३) परळी शहरात सर्वपक्षीय बंद पाळण्यात येणार आहे. व्यापारी, व्यावसायिक व सर्व नागरिकांनी दुकाने बंद ठेवून या बंदला मोठ्या संख्येने प्रतिसाद द्यावा. आपल्या एकात्मतेतूनच या चिमुकलीला न्याय मिळवून देता येईल असे सांगून ते म्हणाले की, “नराधमाला समाजात जागा नाही – फाशी झालीच पाहिजे..! न्याय मिळेपर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहील.
No comments:
Post a Comment