पुणे (प्रतिनिधी) : रविवार असल्याने मित्राचा फिरायला जाण्याचा प्लॅन ठरला. पावसाळा असल्याने त्यांनी कासारवाई धरण परिसरात जायचं ठरवले. धरण परिसरात गेल्यानंतर ते पोहायला उतरले आणि १९ वर्षीय संतोषचा बुडून मृत्यू झाला. २४ तासानंतर त्याचा मृतदेह सापडला.
रविवारी (२० जुलै) संतोष हा त्याच्या चार मित्रांसोबत कासारवाई धरण परिसरात फिरायला गेला होता. सकाळी ११ वाजेच्या सुमारास ते धरणात पोहण्यासाठी उतरले. पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. त्यानंतर मित्रांनी आजूबाजूला मदत मागितली.
रविवार सकाळपासून त्याचा मावळमधील वन्यजीव रक्षक संस्था, लोणावळ्यातील शिवदुर्ग रेस्क्यू यांच्या मदतीने पोलिसांनी शोध सुरू केला. पण, रात्रीपर्यंत त्याचा मृतदेह मिळाला नाही.
त्यानंतर सोमवारी (२१ जुलै) सकाळी पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात आली. सोमवारी सकाळी ११ वाजता त्याचा मृतदेह मिळाला. मृत तरुणाचे नाव संतोष शहाजीराव असे आहे. मयत तरुण बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात असलेल्या मालेगावचा रहिवासी आहे.
लघुशंकेला गेला आणि तलावात पडला
ओतूरमध्येही फिरण्यासाठी आलेल्या एका तरुणाचा धरणात बुडून मृत्यू झाला. रविवारी २१ वर्षीय तरुण धुरनळी जवळच्या तलाव परिसरात मित्रांसोबत फिरायला आला होता. जहीर अली सराजू अन्सारी असे मयत तरुणाचे नाव असून, तो सध्या नारायणगाव येथे राहत होता. तो मूळचा उत्तर प्रदेशातील कुसीनगर जिल्ह्यात असलेल्या पडरौणा गावाचा आहे.
जहीर अली हा चार मित्रांसोबत धरण परिसरात फिरत होता. दुपारी ४ वाजता तो धरणजवळच लघुशंकेला गेला. त्यावेळी पाय घसरून तो धरणात पडला. त्याला मदत मिळेपर्यंत त्याचा बुडून मृत्यू झाला.
No comments:
Post a Comment