Tuesday, June 28, 2022

उद्धव ठाकरेंचं बंडखोर आमदारांना भावनिक आवाहन .


मुंबई(प्रतिनीधी )शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुवाहाटी येथील शिवसेना आमदारांना परत फिरण्याचं आवाहन केलं आहे. मला काळजी वाटते, अजूनही वेळ गेली नाही, समोर येऊन बोला, आपण मार्ग काढू, अशा शब्दात ठाकरेंनी आमदारांना आश्वस्त केलं आहे. त्यामुळे बंडखोर आमदार आता काय पाऊल उचलतात, याकडे सर्वांचं लक्ष आहे.

एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडाला एक आठवडा होत आला, मात्र बंडखोरांसोबत कुठलीही सकारात्मक चर्चा झाल्याचं वृत्त आलेलं नाही. त्यानंतर ठाकरे सरकारकडून त्यांचे परतीचे दोर कापण्यास सुरुवात झाली होती. काल ठाकरे सरकारकडून नऊ मंत्र्यांकडील खाती काढून घेण्यात आली. तर त्याआधीच १६ बंडखोर आमदारांना कारवाईबाबत नोटीस पाठवण्यात आली होती. एकीकडे संजय राऊत, आदित्य ठाकरे यांनी नावं घेऊन घेऊन आमदार-मंत्र्यांवर हल्ला चढवला आहे. अशातच उद्धव ठाकरेंनी त्यांच्याशी सामोपचाराने बोलत पुन्हा एकदा हात पुढे केल्याचं चित्र आहे.


उद्धव ठाकरे यांच्याकडून काय आव्हान?

शिवसैनिक आमदार बांधवानो आणि भगिनींनो

जय महाराष्ट्र !

आपण गेल्या काही दिवसांपासून गुवाहाटी येथे अडकून पडलेले आहात. आपल्या बाबत रोज नवीन माहिती समोर येत आहे, आपल्यातील बरेच संपर्कातही आहेत आपण आजही मनाने शिवसेनेत आहात. आपल्यापैकी काही आमदारांच्या कुटुंबातील सदस्यांनी देखील संपर्क साधून आपल्या मनातील भावना मला कळवल्या आहेत, आपल्या भावनांचा मी शिवसेनेचा कुटुंबप्रमुख म्हणून आदर करतो, कुटुंबप्रमुख म्हणून तुम्हाला मनापासून सांगतो अजूनही वेळ गेलेली नाही, असं उद्धव ठाकरे यांनी लिहिलं आहे.

माझं आपल्याला सगळ्यांना आवाहन आहे, आपण या माझ्या समोर बसा, शिवसैनिकांच्या आणि जनतेच्या मनातील संभ्रम दूर करा, यातून निश्चित मार्ग निघेल, आपण एकत्र बसून यातून मार्ग काढू. कोणाच्याही कोणत्याही भूल थापांना बळी पडू नका, शिवसेनेने जो मान सन्मान तुम्हाला दिला, तो कुठेही मिळू शकत नाही, समोर आलात बोललात तर मार्ग निघेल. शिवसेना पक्षप्रमुख आणि कुटुंबप्रमुख म्हणून आजही मला तुमची काळजी वाटत आहे. समोर येऊन बोला आपण मार्ग काढू.

आपला नम्र

उद्धव बाळासाहेब ठाकरे

No comments:

Post a Comment