बीड (प्रतिनिधी): बीड जिल्ह्यात कधी कोरडा दुष्काळ पडतो तर कधी ओला दुष्काळ पडतो. अस्मानी संकटात या जिल्ह्यातील नागरिक सतत होरपळत आहेत. मात्र, या वेळेस पावसाने कहरच केला आहे. एका बाजूला शेतातील पिकांचं नुकसान झालं, घरं पडली, घरात पाणी शिरलं, धान्य वाहून गेले, शाळेची पुस्तकं वह्या वाहून गेल्या, जनावरे वाहून गेली, पुल वाहून गेले, शेतातील माती वाहून गेली आणि या प्रवाहात बीड तालुक्यातील पिंपळवाडी गावचा एक 10 वर्षाचा शाळकरी मुलगा देखील वाहून गेला. बिंदुसरा नदीला पूर आला आणि होत्याच नव्हतं झालं.
मिळालेल्या अधिकच्या माहितीनुसार, बीड तालुक्यातील पिंपळवाडी येथील रहिवासी असलेला दहा वर्षांचा आदित्य उत्तम कळसाने हा बिंदुसरा नदीच्या पुरात वाहून गेला. ही घटना त्याच्या आई समोरच घडली आणि ती आपल्या लेकराला वाचवण्यासाठी काहीही करु शकली नाही. या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.
गावातील ग्रामस्थांनी त्याचा तासभर पाण्यात शोध घेतला त्यानंतर त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. या घटनेने कळसाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. बीडमध्ये झालेल्या पावसात त्यांना आपल्या मुलाला गमवावे लागले. आदित्य गेल्यापासून या घरात चूल देखील पेटली नाही. आदित्यची आई निशब्द आहे. आदित्यला एक मोठा भाऊ आहे तो देखील त्याच जिल्हापरिषद शाळेत पाचवित शिक्षण शिकत आहे. आदित्य हा घरात सर्वात लहान होता. आता त्याच्या पश्चात त्याचे वडील, आई आज्जी, आजोबा, भाऊ असा परिवार आहे. खांद्यावर खेळवलेल्या नातवाला गमवावं लागल्याने आदित्यच्या आजीला आणि आईला पाहून गावकऱ्यांच्याही डोळ्यात पाणी आलं.
No comments:
Post a Comment