Tuesday, November 14, 2023

ऐन दिवाळीत पोलिसांनी केली धरपकड; बीड जाळपोळ प्रकरणात 181 जणांची दिवाळी जेलमध्ये.


बीड (प्रतिनिधी): काही दिवसांपूर्वी  जिल्ह्यात मराठा आरक्षणाच्या आंदोलनालात घुसून काही अज्ञात लोकांनी राजकीय नेत्यांच्या घरी आणि कार्यालयात जाळपोळ केल्याची घटना समोर आली होती. त्यामुळे या प्रकरणात पोलिसांकडून गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले होते. तर, बीड पोलिसांनी आरोपींची ओळख पटवून आतापर्यंत 181 जणांना बेड्या ठोकल्या आहे. यातील काही जण पोलिस कोठडीत, तर काही कारागृहात आहेत. त्यामुळे या आरोपींना दिवाळी  जेलमध्ये साजरी करण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे या घटनांमध्ये पोलिसांनी आणखी 400 जणांची ओळख पटवली आहे. 

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांचे आंतरवाली सराटीत उपोषण सुरु असतानाच, 30 व 31 ऑक्टोबर रोजी बीडमधील आंदोलक आक्रमक झाले. पाहता पाहता शहरात जाळपोळ सुरु झाली. राष्ट्रवादी भवन, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, बीआरएसचे दिलीप गोरे यांची कार्यालये पेटवून देण्यात आली. माजलगाव येथील नगरपालिकेसह आमदार प्रकाश सोळुंके,  आमदार संदीप क्षीरसागर यांचे राहत्या घरांना आग लावण्यात आली. या प्रकरणी पोलिसांकडून 307 सारखे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी आरोपींची ओळख पटवत त्यांना अटक करण्याची मोहीम राबवली आहे. ज्यात आतापर्यंत 181 जणांना बेड्या ठोकण्यात आले आहे. 

ऐन दिवाळीत पोलिसांची धरपकड. 

शांततेत चाललेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला बीडमध्ये हिंसक वळण लागले होते. अचानक सुरु झालेल्या जाळपोळीत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे याची गंभीर दखल पोलिसांनी घेतली आहे. पोलिसांनी घटनेचे व्हिडिओ आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून हल्लेखोरांची ओळख पटवली आहे. ज्यात आतापर्यंत 500 पेक्षा अधिक लोकांची ओळल पटली आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी आतापर्यंत 100 पेक्षा अधिक लोकांना अटक करून जेलमध्ये तर काहींना न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. तसेच अजूनही पोलिसांची धरपकड सुरूच आहे. ऐन दिवाळीत पोलिसांची धरपकड सुरु असल्याने अनेकांनी शहर सोडले आहे. मात्र, या सर्व आरोपींना शोधून इतर जिल्ह्यात जाऊन पोलीस त्यांना ताब्यात घेत आहे. 

आमच्यासाठी फक्त गुन्हेगार आरोपीच...

दरम्यान, विशेष समाजातील तरुणांना जाणीवपूर्वक अटक करून जेलमध्ये टाकण्यात येत असल्याचा आरोप बीड पोलिसांवर करण्यात येत आहे. मात्र, यावर पोलिसांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. "बीड जाळपोळ प्रकरणात हल्लेखोरांची ओळख पटवूनचं प्रत्येक आरोपी ताब्यात घेतला जात आहे. उपलब्ध असलेले व्हिडिओ आणि सीसीटीव्हीत कैद झालेल्या हल्लेखोरांची ओळख पटवली जात आहे. त्यानंतर अटकेची कारवाई होत आहे. त्यामुळे जाळपोळ करणारे कोणत्या समाजाचे आहे हे आमच्यासाठी महत्वाचे नसून, आमच्यासाठी आरोपी हा आरोपीच आहे हे महत्वाचे असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. 

No comments:

Post a Comment