Saturday, August 5, 2023

बीड जिल्ह्यात 18 तर जालन्यात 19 ऑगस्टपर्यंत मनाई आदेश लागू.पाचपेक्षा अधिक लोकांना जमण्यास निर्बंध.

बीड/जालना (प्रतिनिधी) : स्वातंत्र दिन, मराठा आरक्षण मिळावे तसेच इतर मागणीसाठी व शेतकऱ्यांचे विविध मागण्यांसाठी विविध संघटनांकडून आत्मदहन, उपोषण, धरणे मोर्चे, निदर्शने, रास्तारोको, इत्यादी सर्व प्रकारची आंदोलानात्मक कार्यक्रम घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.  तसेच सध्या महाराष्ट्रात राजकीय दृष्ट्या सत्ताधारी व विरोधकात एकमेकाविरुध्द आरोप प्रत्यारोप विविध कारणास्तव सुरु आहे. त्यामुळे विरोधकांकडून आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सर्व पार्श्वभूमीवर बीड आणि जालना या दोन्ही जिल्ह्यात मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. तर, पाचपेक्षा अधिक लोकांना जमण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. जालना जिल्ह्यासाठी 6 ऑगस्ट रोजीच्या 6.00 वाजेपासुन ते 19 ऑगस्ट रोजीचे रात्री 12.00 वाजेपर्यंत आणि बीड जिल्ह्यात 4 ऑगस्टच्या रात्री 12 वाजेपासून ते 18 ऑगस्ट रोजीच्या रात्री 12 वाजेपर्यंत मुंबई पोलिस अधिनियम कलम 37 (1) (3) अन्वये हा मनाई आदेश जारी करण्यात आला आहे.

अपर जिल्हादंडाधिकारी जालना आणि बीड यांना प्राप्त अधिकारानुसार पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) अन्वये शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्या व्यतिरिक्त इतर कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी किंवा त्या आसपास शस्त्रे, लाठ्या, सोटे, बंदुके, तलवारी, भाले, चाकु व इतर शरीरास इजा अथवा अपाय करणाऱ्या वस्तु जवळ बाळगणार नाही. तीक्ष्ण पदार्थ अथवा स्फोटके सहज हाताळता येतील अशी घातक वस्तू जवळ बाळगणार नाही.

दगड किंवा इतर उपकरणे किंवा प्रवर्तक शस्त्रे गोळा करुन ठेवणार नाही किंवा जवळ बाळगणार नाही. व्यक्तींच्या किंवा समुहाच्या भावना जाणुनबुजुन दुखविण्याचे उद्देशाने असभ्यतेने भाषण म्हणणार नाही, वाद्य वाजविणार नाही, गाणे म्हणणार नाही. व्यक्तींचे किंवा शवाचे किंवा त्याच्या प्रतिकृतीचे प्रदर्शन करणार नाही. आवेषी भाषण, अंगविक्षेप, विडंबनापर नकला करणार नाही आणि सभ्यता किंवा नितिमत्ता यास बाधा येईल किंवा ज्यामुळे राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा कोणतीही वस्तु बाळगणार नाही. तसेच पाच किंवा अधिक व्यक्तींना जमण्यास किंवा सभा, मिरवणुका, मोर्चा काढण्यास मनाई करण्यात आली आहे. 

यांना असणार सूट... 

हा आदेश कामावरील कोणताही ‍अधिकारी किंवा कर्मचारी यांना लागू होणार नाही.  तसेच विवाह, अंत्ययात्रा आणि पोलीस अधिक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुका, सभा, मोर्चा यांना लागू राहणार नाही. हा आदेश जालना आणि बीड या दोन्ही संपूर्ण जिल्ह्यात लागू राहणार आहे. 

No comments:

Post a Comment