मुंबई: (प्रतिनीधी) पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणात (Pooja Chavan Suicide case) शिवसेनेच्या मंत्र्यांचे नाव समोर आल्यानंतर ‘मातोश्री’ने कमालीचा सावध पवित्रा अंगिकारला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) एरवीदेखील खूपच सावधपणे राजकीय निर्णय घेण्यासाठी ओळखले जातात. पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणानंतर मुख्यमंत्र्यांच्या नेहमीच्या सावधपणात आणखीनच भर पडली आहे. त्यामुळेच सध्या उद्धव ठाकरे हे संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्याबाबत कोणतीही ठोस भूमिका घेताना दिसत नाही. (Pooja Chavan suicide case Maharashtra)
सूत्रांच्या माहितीनुसार, संजय राठोड यांनी या प्रकरणात आपली बाजू मांडण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या भेटीची वेळ मागितली होती. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांना अजूनपर्यंत आपला निर्णय कळवलेला नाही. तसेच अद्याप संजय राठोड आणि उद्धव ठाकरे यांच्यात फोनवरही सविस्तर चर्चा झाली नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
* शिवसेनेची नेत्यांना तंबी
संजय राठोड यांच्या प्रकरणामुळे शिवसेनेची प्रचंड कोंडी झाली आहे. या प्रकरणी शिवसेना नेत्यांना प्रतिक्रिया विचारल्या जात आहेत. त्यातच राठोड यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. त्यांची बाजू मांडलेली नाही. त्यामुळे काय प्रतिक्रिया द्यावी हा शिवसेना नेत्यांसमोर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर मीडियासमोर कोणतीही प्रतिक्रिया देऊ नका, अशी तंबीच शिवसेनेकडून नेत्यांना देण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.
* राठोडांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल आणि आज या प्रकरणाची सविस्तर माहिती घेतल्याचं सूत्रांनी सांगितलं. पूजा चव्हाण प्रकरणाचा तपास कुठपर्यंत आला? तपासात काय तथ्य आहे? राठोड यांचा कितपत सहभाग आहे? व्हायरल क्लिपमध्ये कितीपत सत्यता आहे? त्यातील आवाज राठोडांचाच आहे का? आधी बाबतची माहिती मुख्यमंत्र्यांनी घेतली असावी असं सूत्रांनी सांगितलं. या प्रकरणी मुख्यमंत्री गंभीर असून ते राठोडांवर कारवाई करू शकतात, असंही सूत्रांचं म्हणणं आहे. त्यामुळे आजचा दिवस राठोड यांच्या राजकीय कारकिर्दीसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचं मानलं जात आहे.

No comments:
Post a Comment